Spread the love

भगवा चौकातील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय अखेर स्वतःहून हटवले

अ‍ॅड. पंकज गोरे यांचा पुढाकार; “कार्यालय काढले, आता अवैध धंद्यांविरोधात हिंदू युवा सेना आंदोलन करणार का?” असा सवाल

धुळे : धुळे शहरातील बहुचर्चित असलेले भगवा चौक येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यालय एडवोकेट पंकज गोरे यांनी स्वतः पुढाकार घेत काढून घेतले असून या कार्यालयाच्या काढण्यासाठी मागणी करणारी भाजपा पुरस्कृत रजिस्टर नसलेली तथाकथित हिंदू युवा सेना आता अवैध धंद्याविरोधात आवाज उठवेल का किंवा त्यांचे नेते यावर आंदोलनाला बसतील का? असा सवाल देखील त्यांनी आता उपस्थित केला आहे.

धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यालय हे अतिक्रमित असल्याचा आरोप करीत भाजपा पुरस्कृत हिंदू युवा सेनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर भर रस्त्यात स्टेज टाकून आंदोलन करण्यात आले होते. याजागी दुसऱ्या पक्षाचे पदाधिकारी किंवा सामान्य धुळेकर असते तर पोलीस प्रशासनाने लागलीच त्याच मिनिटाला ते आंदोलन उधळून सबंधितांवर गुन्हे दाखल केले असते परंतु तसे झाले नाही. भाजपा पुरस्कृत संघटनेला आंदोलन करण्यासाठी आश्रय देण्यात आला. या दरम्यान दोन कार्यालय नुकतीच दोन दिवसांपूर्वी उभी राहिली होती ती काढण्याची व ४० वर्ष जुने असलेले शहरातील भगवा चौक येथील शिवसेनेचे कार्यालय देखील अतिक्रमित असल्याचा आरोप करण्यात आला होता, हे कार्यालय काढण्याची मागणी देखील भाजपा पुरस्कृत हिंदू युवा सेनेने मनपा प्रशासनाकडे केली होती. हे कार्यालय काढून घेण्याची नोटीस महानगरपालिकेने दिली होती. या नोटीसीला एडवोकेट पंकज गोरे यांनी उत्तर देत दहीहंडी उत्सव आणि गणेश उत्सव पूर्ण साजरे झाल्यानंतर सदरचे कार्यालय काढून घेण्यात येईल कारण दहीहंडी उत्सव व गणेश उत्सव जल्लोषात साजरा ह्याच कार्यालयाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असतो. या दरम्यान दही हंडी पथक अथवा गणेशोत्सवात भक्तांना कोणतीही इजा झाल्यास तात्पुरता स्वरुपात उपचारासाठी हे कार्यालय उपयोगी पडेल असे एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने मनपा प्रशासनाला कळविण्यात आले होते.

मात्र त्यानंतर टपरी धारक व रोडगाडी धारक यांच्यावर प्रशासनातर्फे एककलमी कार्यवाहीचा धडाका सुरू झाला. ज्या टपऱ्या किंवा रोडगाडी खरच वाहतुकीला अडथळा आहे ते काढले असते तर समजू शकतो परंतु सरसकट सर्व टपऱ्या व रोडगाडी धारकांवर कार्यवाही करणे म्हणजे ही राक्षसी कार्यवाही झाली. यासंदर्भात वेगवेगळे व्यावसायिक टपरी धारक आम्हाला भेटून जात होते मदत करा आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? असे प्रश्न आम्हाला विचारू लागले त्याच दरम्यान त्यांनी आवर्जून सट्टा पिढ्यांचा उल्लेख केला ते अतिक्रमण मध्ये असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही आणि आम्हा कष्टकऱ्यांवरच कारवाई का? आम्ही धुळ्यात राहायचे नाही का? असा देखील प्रश्न त्यांनी मला केला. तेव्हा मी त्यांना आश्वासित केले आणि सांगितले की गेल्या तीन महिन्यांपासून अवैध धंदे बंद करा परंतु कारवाई आणखी झालेली नाही. आता तुम्ही आलाच आहे तर तुमच्या वरील कारवाई थांबवण्यासाठी लढतो. तेव्हा पासून प्रशासनाला पत्र लिहितोय की टपरी धारक व रोडगाडी धारक यांच्यावरील कारवाई थांबवा व अवैध धंद्यांवर कारवाई करा. अन्यथा आंदोलन उपोषणाला बसेल हा इशारा देखील दिला. तरीही कार्यवाही सुरूच होती त्यामुळे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले.

सदरचे आंदोलन सुरू झाल्यानंतर भाजप पुरस्कृत हिंदू युवा सेनेने गैरसमज पसरविण्याचे काम केले त्यात त्यांची ही चूक नाही त्यांनी महानगरपालिकेतून माहिती घेऊन नोटिशीला दिलेले उत्तर वाचले असते तर त्यांच्या कीळसवान्या अभ्यास नसलेल्या बुद्धीचा प्रचार प्रसार केला नसता. त्यांच्या अश्या खोट्या प्रचाराला जास्त खतपाणी मिळू नये तसेच प्रशासनाचा ताण वाढू नये त्यांनी आमच्या पत्राला उत्तर देण्याआधीच आज एडवोकेट पंकज गोरे यांनी स्वतः पुढाकार घेत सदरचे कार्यालय काढून घेतले असून कार्यालयाच्या अतिक्रमणावरून रान उठवणारी भाजप पुरस्कृत हिंदू युवा सेना किंवा त्यांचे नेते आता टपरी धारकांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध तसेच अवैध धंद्यांविरोधात आंदोलन करेल का? किंवा या अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करेल का? किंवा अवैध धंद्याविरोधात पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी करेल का? असा सवाल ऍड.पंकज गोरे यांनी उपस्थित केला आहे.

आता कार्यालय नाही तरी पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून अवैध काळे धंदे तत्काळ बंद करा व अतिक्रमण मोहीम थांबवून जे टपरी धारक अथवा रोडगाडी धारक कोणत्याही वाहतुकीला नडत नसतील त्यांच्यावर कारवाई न करता येणाऱ्या हिंदूंचे सण उत्सव आपल्या हिंदू बांधवांना जे स्व-कष्टाने दोन पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो त्याला सण उत्सव करू द्या.

आगामी काळात दही हंडी अथवा गणेशोत्सव नसता तर महानगरपालिकेची नोटिस आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही कार्यालय काढून घेतले असते पण सण तोंडावर आल्याने आम्हाला मागील सणांचा अनुभव असल्याने दही हंडी पथकातील युवती असू द्या किंवा गणेशोत्सव असू द्या या दरम्यान भाविकांना येणारा अपघाती त्रास त्यांच्या सोयी साठी वेळ मागितली होती. मात्र विरोधकांनी अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा संबंध कार्यालयाशी जोडला असल्याचे सांगत ऍड.पंकज गोरे यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला आहे.
तसे पण आज पर्यंत धुळे जिल्ह्यातील अथवा शहरातील कोणत्याही सामान्य नागरिकांनी कधी कार्यालयाबाबत तक्रार केली नाही. कारण या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक जन-सामान्यांना मदतीचा हात दिला जातो हे माहिती आहे. फक्त राजकिय द्वेषापोटी तक्रार करणारी भाजप हे विसरली याच कार्यालयाच्या आशीर्वादाने तुमचे सुरवातीला दोन-तीन नगरसेवक निवडून यायचे. आज भाजप मधील बरीच मंडळी अशी आहे ज्यांची राजकीय कारकीर्द इथूनच सुरू झाली. बाकी तर कित्येक नगरसेवक ज्यांनी AB फॉर्म ह्याच कार्यालयातून घेतला आणि नगरसेवक झाले. तेव्हा त्यांना हे कार्यालय अतिक्रमित आहे असे वाटले नाही. पण असो वेळ काळ बदलतो माणूस बदलतो त्यानुसार प्रवृत्ती बदलते. विरोधकांना जे हवे आहे ते आम्ही देणार नाही. शहराचे वातावरण त्यांना खराब करायचे ते आम्ही होऊ देणार नाही. विरोधकांनी केलेले आरोप सर्व खोटे आहेत ह्या साठी आम्ही महानगरपालिकेचे आम्ही मागितलेल्या वेळेला उत्तर येण्या आधीच एडवोकेट पंकज गोरे यांनी स्वतः कार्यालय काढून घेतले आहे.

आम्ही शिवसैनिक ज्या रस्त्यावर उभे राहतो तिथेच आमचे कार्यालय सुरू होत असते कारण आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेलो, लग्नांना,पूजन, सुखा-दुःखात, हॉस्पिटल-शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालय कुठेही गेलो आणि सामान्य जनतेला दिसलो तर त्यांच्या असलेल्या अडचणी आमच्यापर्यंत ते मांडतातच त्यामुळे कार्यालय असेल तरच सामान्य जनता आमच्या पर्यंत पोहोचेल असे काही नाही. आमची आणि जनतेची असलेली नाळ कोणीही राजकीय विरोधक कमी करू शकत नाही असे ही एडवोकेट पंकज गोरे यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version