Spread the love

मुंबई : मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका २-बी (टप्पा १) चे शानदार लोकार्पण करण्यात आले. या नवीन मार्गिकांमुळे मुंबईतील कार्यान्वित मेट्रो नेटवर्कने आता १०० किलोमीटरचा टप्पा ओलांडला असून, ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न अधिक जवळ आले आहे.

मंगळवारी उद्घाटन झाले असले तरी, या दोन्ही मार्गिकांवर बुधवार, ८ एप्रिल पासून पहाटे ५:५० वाजल्यापासून नियमित व्यावसायिक सेवा सुरू केली जाणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन मार्गांमुळे दररोज किमान १ ते १.५ लाख अतिरिक्त प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज आहे.

मीरा-भाईंदरला थेट मेट्रोची जोड: मार्गिका ९

ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यानच्या ४.५ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे.

* फायदा: पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. ही मार्गिका सध्याच्या ‘रेड लाईन’ (मेट्रो ७) ला जोडली गेल्याने प्रवाशांना मीरा-भाईंदर ते थेट गुंदवली (अंधेरी) आणि पुढे मेट्रो ३ च्या माध्यमातून दक्षिण मुंबईपर्यंत विनासायास प्रवास करता येईल.

पूर्व उपनगरात मेट्रोचा विस्तार: मार्गिका २-बी

दुसरीकडे, पूर्व उपनगरातील चेंबूर ते मानखुर्द पट्ट्याला जोडणाऱ्या मेट्रो २-बी मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे (डायमंड गार्डन ते मंडाले) उद्घाटन करण्यात आले. ५.३८ किलोमीटरच्या या मार्गावर ५ स्थानके आहेत.

* फायदा: यामुळे चेंबूर, मानखुर्द आणि मंडाले परिसरातील नागरिकांना वेगवान सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. भविष्यात ही मार्गिका अंधेरी पश्चिमपर्यंत विस्तारली जाणार असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अंतर अधिक कमी होणार आहे.

“महाराष्ट्र मेट्रो क्षेत्रात अग्रेसर”: मुख्यमंत्री

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस मुंबईकरांसाठी सुवर्णक्षण आहे. मेट्रोच्या जाळ्यामुळे रस्त्यांवरील २० ते ३० टक्के वाहतूक कमी होईल. दिल्लीनंतर महाराष्ट्र आता मेट्रोच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पांमुळे सामान्य प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार असल्याचे नमूद केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version