ग्रामीण ते शहरी भागात तरुणांपर्यंत पोहोचणार विचारप्रवाह; डीजे-रॅलीऐवजी प्रबोधनाला प्राधान्य देण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्रभर महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी युवा व्याख्याते प्रशांत पवित्रे यांनी निशुल्क प्रबोधन मोहिम हाती घेतली असून या उपक्रमाला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “आपणास जे जे कळे इतरांशी सांगूनी शहाणे करून सोडावे सकळ जनास” या संतवचनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ही मोहीम राबविण्यात येत आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर साजऱ्या होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे. खेडोपाडी तसेच शहरी भागात तरुणाईपर्यंत महापुरुषांचा खरा इतिहास, त्यांचे विचार आणि सामाजिक योगदान पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशांत पवित्रे आपल्या व्याख्यानांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेली लोकशाही व्यवस्था, तसेच भारताविषयीचे त्यांचे दूरदर्शी विचार यावर सखोल मार्गदर्शन करतात. त्यांच्या संवादात्मक शैलीमुळे तरुणांमध्ये विचारप्रवृत्ती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. ही मोहीम एखाद्या जिल्हा किंवा तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली जाणार असल्याचे पवित्रे यांनी स्पष्ट केले. विविध सामाजिक संघटना, चळवळीतील पदाधिकारी, विचारवंत तसेच बहुजन समाजातील तरुणांनी या प्रबोधनात्मक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, जयंती उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या डीजे, डॉल्बी किंवा रॅली यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच समाजपरिवर्तनाला चालना देणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम अधिक प्रमाणात आयोजित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “उत्सव साजरे करताना केवळ दिखाऊपणावर भर न देता समाजाला दिशा देणारे विचार पोहोचवणे महत्त्वाचे आहे,” असे मत त्यांनी मांडले.
विशेष म्हणजे, प्रशांत पवित्रे यांचे सर्व व्याख्यान कार्यक्रम पूर्णतः निशुल्क असून राज्यभर महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्याचा त्यांचा ध्यास आहे. इच्छुकांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ७६२०५०१०४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात विचारप्रबोधनाची नवी लाट निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून समाजात समता, बंधुता आणि जागरूकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे.
