Spread the love

तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

पाळधी/धरणगाव/जळगाव : “वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संतांच्या विचारांचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी राजकारण नको. येथे येताना मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर आचरणात आणण्यासाठी आहेत. याच विचारांतून माणूस आणि समाज घडतो. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आणि ओळख असून तिचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदासजी महाराज होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, तरडे सारख्या पवित्र भूमीत परमार्थाचे जे कार्य सुरू आहे, ते समाजासाठी प्रेरणादायी आहे. संतांच्या मार्गावर चालणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करतो असेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

धरणगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र तरडे खुर्द येथे वारकरी परंपरेच्या भक्तीमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ह.भ.प. बाबुलाल सीताराम पाटील (नाना) यांना संत नामदेव खालसा आखाड्याचे प्रमुख हभप महामंडलेश्वर अनंतदासजी महाराज यांच्या हस्ते महंत पदवी व वारकरी गुणीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला महंत प्रणवगिरी बाबाजी, महंत नागेशानंदजी, महंत योगी ऋषिनाथजी, हभप सौरभ महाराज, हभप नवनाथ महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, गौप्रेमी गजानन वरसाडेकर, हभप गोविंद महाराज पाचोरा, हभप रुपचंद बाबा, हभप कौतिक महाराज लोणीकर, स्वयंभू त्रिवेणेश्वर महादेव संस्थानाधिपती निमगाव, हभप कृष्णा महाराज, हभप रमेश महाराज तसेच नाशिकहून आलेले विविध संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी संत नामदेव खालसा आखाड्याच्या वतीने ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हभप बाबुलाल नाना यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील हे पूर्ण वेळ श्रोत्यांमध्ये बसून सहभागी झाले होते. व्यासपीठावर केवळ वारकरी, साधूसंत व कीर्तनकार मंडळी विराजमान होती. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सूत्रसंचालन हभप प्रा. सी. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आमरस-पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी तरडे येथील तरुण मित्रमंडळ, संत तानसेन भजनी मंडळ व महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version