‘अ’ प्रभागात साफसफाईला गती, पण जीर्ण नाले-गटारांमुळे नागरिकांमध्ये भीती; तातडीने दुरुस्तीची मागणी
कल्याण (संदीप शेंडगे): कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, परिसरातील तुटलेले, मोडकळीस आलेले आणि तुंबलेले नाले व गटारे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या २०१५ नंतर अपेक्षित असलेल्या २०२० च्या निवडणुका कोरोनामुळे न झाल्याने २०२० ते २०२६ या कालावधीत प्रशासकीय राजवट राहिली. या काळात अनेक विकासकामे अर्धवट राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. नगरसेवक निधी उपलब्ध नसल्याने विशेषतः गटारे व नाल्यांच्या बांधकामांमध्ये मोठ्या त्रुटी राहिल्या असून अनेक कामे अपूर्ण किंवा सुरूच झाली नाहीत.
अटाळी, आंबिवली, वडवली, मोहने, पंचशील नगर, जेतवन नगर, महात्मा फुले नगर, उंभर्णी, बल्यानी, टिटवाळा आदी भागांमध्ये नाले व गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी गटारे पूर्णपणे तुटलेली असून पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट घरात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः बल्यानी परिसरात दरवर्षी गटाराचे पाणी घरात शिरून नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
सध्या नालेसफाईची कामे सुरू असली तरी तुटलेल्या गटारांचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ साफसफाई करून समस्या सुटणार नसून, जीर्ण गटारांची तातडीने दुरुस्ती किंवा नव्याने बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता तसेच पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून जलनिस्सारण व्यवस्थेची दुरुस्ती हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पावसाळा जवळ येत असताना केवळ नालेसफाईवर मर्यादित न राहता संपूर्ण जलनिस्सारण यंत्रणा सक्षम करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
