जळगावात चक्का जाम, भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च्याचे आंदोलन; तीन प्रमुख मागण्यांवर देशव्यापी बंद यशस्वी
जळगाव (जगदीश सपकाळे) : ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये चक्का जाम केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या आंदोलनामागे तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. ओबीसी वर्गाची जातीनिहाय जनगणना करावी, उच्च शिक्षण क्षेत्रात एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांवरील भेदभाव रोखण्यासाठी कडक युजीसी इक्विटी रेग्युलेशन लागू करावे आणि २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, या मागण्यांवर आंदोलन करण्यात आले.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली देशभर टप्प्याटप्प्याने आंदोलन राबवले जात असून त्याचा चौथा टप्पा म्हणून हा ‘भारत बंद’ पुकारण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यात २० ठिकाणी आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंद पार पडला. शहरात टॉवर चौक, चित्रा चौक, दाणा बाजार, घाणेकर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक या ठिकाणी शेकडो आंदोलकांनी चक्का जाम केल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
या बंदला राष्ट्रीय सेन संघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आदिवासी टोकरे कोळी महासंघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी यांसह विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग लाभला. जळगाव जिल्ह्यासह देशातील ७२५ जिल्हे आणि ३१ राज्यांमध्ये हा ‘भारत बंद’ यशस्वीपणे पार पडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
