जि.प. सीईओ करिश्मा नायर यांच्याकडे संघटनेचा तगादा; १९ महिन्यांच्या थकबाकीचा प्रश्न ऐरणीवर
पारोळा : राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा निश्चित वेतन आणि टी.ए./डी.ए. वेळेत मिळावे, या प्रमुख मागणीसाठी राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आक्रमक झाली असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी ठोस मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा १० हजार रुपयांचे निश्चित मानधन देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही न झाल्याने राज्यभरातील सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील तब्बल १९ महिन्यांचे थकीत मानधन मिळावे, या मागणीसाठी १ एप्रिल २०२६ पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाची दखल घेत जि.प. सीईओ करिश्मा नायर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांशी सविस्तर संवाद साधून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल, तसेच या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सीईओंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ग्रामरोजगार सहाय्यकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. “न्याय मिळेल” या विश्वासाने संघटनेच्या सदस्यांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.
निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्यासह भुषण महाजन, सूर्यभान पाटील, सचिन पाटील, भरत राठोड, प्रदीप राजपूत, शिवाजी हटकर, उत्तम पाटील, अनिल पाटील, योगेश पाटील आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शासनाने लवकरात लवकर निर्णयाची अंमलबजावणी करून थकीत मानधन वितरित करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
