काही दिवसांपूर्वी एका बाजूची लाईट दुरुस्त, आता दुसरी बाजू बंद; नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
प्रवेशद्वाराच्या रोषणाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर • एका बाजूची लाईट सुरू, दुसरी बंद • सौंदर्यीकरणावर पाणी • प्रशासनाविरोधात नाराजी • संपूर्ण विद्युत यंत्रणेच्या तपासणीची मागणी
नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या मुख्य भव्य प्रवेशद्वाराच्या रोषणाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रवेशद्वाराची एक बाजू सध्या पूर्णपणे अंधारात गेल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष की वारंवार होणारा तांत्रिक बिघाड, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रवेशद्वाराच्या एका बाजूची विद्युत रोषणाई बंद पडल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत संबंधित भागाची दुरुस्ती केली. मात्र आता प्रवेशद्वाराच्या वरच्या पाटीची दुसरी बाजू बंद पडल्याने पुन्हा एकदा रोषणाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूची लाईट सुरू होताच दुसरी बाजू अंधारात जाण्याचा प्रकार नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रवेशद्वार रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाईमुळे विशेष लक्ष वेधून घेत असते. मात्र वारंवार विद्युत यंत्रणेत बिघाड होत असल्याने प्रवेशद्वाराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. यामुळे बाहेरून शहरात येणाऱ्या प्रवाशांसमोरही शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या मते, केवळ एखादी लाईट बदलणे किंवा तात्पुरती दुरुस्ती करणे हा या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. वारंवार उद्भवणाऱ्या बिघाडामागील नेमके कारण शोधून संपूर्ण विद्युत यंत्रणा, वायरिंग आणि नियंत्रण प्रणालीची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.
“एका बाजूची लाईट सुरू झाली की दुसरी बंद पडते, हा प्रकार नेमका कशामुळे घडतो आहे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराच्या प्रवेशद्वारासारख्या महत्त्वाच्या वास्तूची देखभाल अधिक प्रभावीपणे करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
दरम्यान, नशिराबाद नगर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बंद पडलेली लाईट सुरू करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.प्रवेशद्वार पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रकाशमान होणार का आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार, याकडे नशिराबादकरांचे लक्ष लागले आहे.
