स्वच्छतागृहांची दुरवस्था, दुर्गंधीने नागरिक व कर्मचाऱ्यांचे हाल; कोट्यवधींचा निधी नेमका जातो कुठे, असा संतप्त सवाल
भुसावळ | प्रतिनिधी
“स्वच्छ भारत” अभियानाचे फलक झळकत असताना भुसावळ तहसील कार्यालयातील वास्तव मात्र याच्या नेमके उलट असल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्याच्या प्रशासनाचा कारभार ज्या कार्यालयातून चालतो, त्याच कार्यालयातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिक आणि कर्मचाऱ्यांना तीव्र गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
कार्यालयातील स्वच्छतागृहांमध्ये अनेक दिवसांपासून नियमित साफसफाई न झाल्याने सर्वत्र घाण साचली असून असह्य दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली असून आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध शासकीय कामांसाठी तासन्तास कार्यालयात थांबणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षी शासकीय कार्यालयांच्या देखभाल, दुरुस्ती आणि सुविधांवर मोठा निधी खर्च केला जातो. मात्र तहसील कार्यालयातील मूलभूत स्वच्छतेची अशी अवस्था पाहता हा निधी नेमका कुठे खर्च होतो, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये वातानुकूलित सुविधा, स्वच्छ वातावरण आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध असतात. मात्र सामान्य नागरिकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. करदात्यांच्या पैशातून चालणाऱ्या कार्यालयात किमान स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहाची सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्वच्छतागृहांची साफसफाई, आवश्यक दुरुस्ती आणि नियमित स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात येत आहे.
