दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला न्याय द्यावा; मुख्यमंत्र्यांकडे संघरत्न सपकाळे यांचे निवेदन
भुसावळ | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील शिक्षक सुनील मोरे आणि त्यांच्या दोन मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष संघरत्न सपकाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, १७ जुलै २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोता बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे (वय ४२) यांनी आपल्या दोन मुलांसह गोदावरी नदीवरील पुलावरून कार नदीत गेल्याच्या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.
निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, शालेय पोषण आहाराच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीदरम्यान काही अधिकाऱ्यांकडून झालेल्या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच मृत शिक्षकांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
