Spread the love

स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’चा संदेश

समाजकार्य विभाग व आत्मनिष्ठ युवक मंडळाचा संयुक्त उपक्रम; शाळा व तलाठी कार्यालय परिसरात वृक्षलागवड

खर्ची बु. | प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून समाजकार्य विभाग आणि आत्मनिष्ठ युवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खर्ची बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच नवीन तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या उपक्रमास प्रा. योगेश माळी (समाजकार्य विभाग), जि. प. शिक्षिका रेखा बाविस्कर, श्रीमती माधुरी बाविस्कर, सौ. प्रीती चौधरी, आशा सेविका सुनीताताई माळी, प्रतिभा माळी, महिला मंडळ तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने उपक्रमांची गरज
यावेळी बोलताना श्रीमती माधुरी बाविस्कर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली. वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते शुभम माळी यांनी समाजकार्य विभाग व आत्मनिष्ठ युवक मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे सांगितले. वृक्षारोपण हा सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग असून, लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे संगोपन करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी राहुल बागुल, रोशन देशमुख, नंदिनी पवार, माहेश्वरी वसावे, रोहिणी वळवी तसेच कोतवाल, भूषण म्हसके, विशाल माळी आणि रुपेश सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला मंडळाच्या सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

‘एक पेड माँ के नाम’ या प्रेरणादायी संदेशातून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. वृक्षलागवड करून थांबण्याऐवजी लावलेल्या रोपट्यांचे संगोपन करणे हीच खरी पर्यावरणसेवा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version