Spread the love

जिल्हा परिषद मराठी शाळेत २६ वर्षांनी एकत्र आले शाळेचे माजी विद्यार्थी…..

माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य, खेळणी व शाळेला भेटवस्तू देत कृतज्ञता व्यक्त

कल्याणे होळ, प्रतिनिधी :
ज्या शाळेच्या अंगणात बालपण घडले, ज्या शिक्षकांनी जीवनाला दिशा दिली आणि जिथे मैत्रीच्या नात्यांची वीण घट्ट झाली, त्याच शाळेच्या आठवणींना तब्बल २६ वर्षांनी पुन्हा उजाळा मिळाला. कल्याणे होळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सन २००१ ते २००४ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.

अनेक वर्षांनंतर जुन्या वर्गमित्रांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेच्या वर्गखोल्या, परिसर आणि जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गावातील शाळेत आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांचे योगदान

आपल्या आयुष्यातील धावपळीत बालपणीची शाळा अनेकदा मागे पडते. मात्र, ज्या शाळेने आपल्याला घडविले, तिच्याप्रती काहीतरी देणे लागतो, या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खेळणी तसेच शाळेसाठी आवश्यक भेटवस्तू प्रदान केल्या. छोट्याशा कृतीतूनही इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता येतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

जुन्या शिक्षकांची भेट ठरली भावनिक क्षण

माजी विद्यार्थ्यांना घडविणारे आदरणीय सोपान गुरुजी यांची अनेक वर्षांनंतर भेट झाल्याने स्नेहमेळाव्याला विशेष भावनिक रंग मिळाला. गुरुजींसोबत मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

यावेळी अंगणवाडीतील शिक्षणसेविका सुरेखा बाई आणि अलका बाई यांनाही विशेष निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. बालपणी ज्या प्रेमाने त्यांना ‘बाई’ म्हणून संबोधले जात होते, त्याच आपुलकीने त्यांचा सन्मान करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

शिक्षक व ग्रामस्थांचे सहकार्य

स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यमान शिक्षक राहुल सोनवणे सर व सोनवणे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले. गावातील ग्रामस्थांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला. जुन्या मित्रांची भेट, शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि शाळेसाठी केलेले योगदान यामुळे हा स्नेहमेळावा सर्वांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणारा ठरला.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी इतर शाळांतील जुन्या वर्गमित्रांनाही आवाहन केले की, आपल्या शाळेला आयुष्यातून कधीही विसरू नका. आपल्या मित्रांच्या गटानेही शाळेत असा स्नेहमेळावा आयोजित करून शाळेला भेट द्यावी आणि शक्य ते योगदान द्यावे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version