Spread the love

मुंबई : डोंबिवलीतून संतापजनक घटना समोर आली आहे. उंदीर मारण्याच्या विषारी औषधामुळे सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात एकलव्य अॅनिमल्स पेडिग्री कंपनीचे मालक वीरेंद्र कुमार निषाद यांच्यासह त्यांचा भाऊ आणि काही कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत श्वानांचे शव पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारले
डोंबिवलीजवळील धामटण गाव परिसरात भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. उंदीर मारण्याचे विषारी औषध परिसरात टाकून सात भटक्या कुत्र्यांचा जीव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा किशोर सुर्वे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारीत गंभीर आरोप
तक्रारीनुसार, सुचित्रा सुर्वे या गेल्या दोन वर्षांपासून धामटण गावातील एकलव्य कारखाना परिसरात राहत असून त्या 2021 पासून भटक्या कुत्र्यांना अन्न देत आहेत. त्यांच्या घराजवळच एकलव्य अॅनिमल्स पेडिग्री कंपनीचा कारखाना असून त्याचे मालक वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि काही कामगार यांनी 12 मार्च 2026 पासून परिसरात उंदीर मारण्याची पावडर टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. ही विषारी पावडर खाल्ल्याने सुरुवातीला चार आणि त्यानंतर आणखी तीन अशा एकूण सात कुत्र्यांचा मृत्यू झाला. तसेच याआधीही अशाच पद्धतीने एकूण 36 भटकी व पाळीव कुत्री मारल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पाळीव श्वानालाही मारण्याची धमकी
याबाबत जाब विचारला असता आरोपींनी ‘मी भटक्या कुत्र्यांना मारणारच, तुमच्या पाळीव श्वानालाही मारणार’ अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि काही कामगारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कठोर कारवाई होणार
दरम्यान, मृत कुत्र्यांचे शव पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सुमारे 90 हजार भटकी कुत्री असल्याची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या महासभेत या विषयावर चर्चा झाली होती. मात्र या घटनेमुळे प्राणी संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version