संघवी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भटके-विमुक्त जाती-जमाती दिन उत्साहात
“भारतीय इतिहासात भटक्या-विमुक्त जातींचे मोलाचे योगदान” — ॲड. रवींद्र गजरे; चित्रकला व निबंध स्पर्धेचेही आयोजन
एरंडोल, उत्राण : श्री सुरेशचंद बी. संघवी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ३१ ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त जाती-जमाती दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमासह चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन देवमन माळी होते, तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ॲड. रवींद्र गजरे उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महान योद्धे महाराणा प्रताप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज आणि राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
“भटक्या-विमुक्त समाजाचे इतिहासातील योगदान महत्त्वाचे”
यावेळी शिक्षक भागवत माळी यांनी भटके-विमुक्त जाती-जमातींच्या सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते ॲड. रवींद्र गजरे यांनी भटक्या-विमुक्त समाजाशी संबंधित महापुरुषांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत भटक्या-विमुक्त जाती-जमातींचे मोलाचे योगदान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भटक्या-विमुक्त समाजातील विविध घटक, त्यांच्या पारंपरिक व्यवसायपद्धती, परंपरा आणि संस्कृती यांचे त्यांनी विस्तृत विवेचन केले. या समाजाच्या इतिहासाचा आणि योगदानाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
अध्यक्षीय भाषणात चेअरमन देवमन माळी यांनी शाळेत शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील तसेच इतर विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेऊन आपली शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.
भटके-विमुक्त जाती-जमातींसाठी शासनाकडून विविध शिष्यवृत्ती आणि कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, या योजनांचा लाभ घेऊन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात यावे, असे त्यांनी सांगितले.
शाळेच्या सचिव शीतल माळी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
चित्रकला, निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग
भटके-विमुक्त जाती-जमाती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी शीतल ठाकूर आणि राहुल सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण जाधव यांनी केले.
यावेळी गणेश महाजन, बुद्धभूषण निकम, राहुल सोनवणे, धनंजय तिवारी, सनी राठोड, निखिल चौधरी, रविकांत मालचे, विजेंद्र सोनार, दिनेश माळी, सागर म्हात्रे, हिना शेख, लीना पाटील, रेणू बिर्ला, मयुरी बिर्ला, नीलिमा कासार, सुरेखा पाटील, शुभांगी पाटील, शीतल ठाकूर, धनश्री महाजन, मोहिनी कुंवर, जया कोळी, मीना चिंचोरे, राजश्री मराठे, नेहा राजपूत, मोरे, वर्षा पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर भदाणे, भूषण चौधरी, जगन्नाथ फराटे, आत्माराम सोनगीरे, चंदू रल, किरण घोडेस्वार, गुणवंत पाटील, रोहित कोळी आणि शिवदास महाजन यांनी सहकार्य केले.
