Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मंगळवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे हा आहे. मोहिमेअंतर्गत गावागावांत आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांची आरोग्य तपासणी, आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार यांवर भर दिला जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा थेट ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहोचवणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचल्यास ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हे अभियान संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवले जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना ६५.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version