Spread the love

नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी

देशातील राजकीय वातावरणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे चित्र दिसत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर झालेल्या वैयक्तिक आरोपांनंतर या वादाला कायदेशीर वळण लागले आहे. मुख्यमंत्री शर्मा यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर आसाम पोलीस खेडा यांना अटक करण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.

पवन खेडा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, “पवन खेडा यांच्यासारख्या लोकांमुळे काँग्रेसची पातळी खालावली आहे. मी त्यांना ‘पवन येडा’ बनवूनच सोडेन. राहुल गांधींपासून पवन खेडांपर्यंत वरून खाली सर्वच काँग्रेसवाल्यांना वेड लागले आहे.” मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भाषेच्या घसरलेल्या पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

नेमका वाद काय?

या वादाची ठिणगी पवन खेडा यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीवर केलेल्या एका खळबळजनक आरोपामुळे पडली. खेडा यांनी दावा केला होता की, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे तीन वेगवेगळे पासपोर्ट आहेत. या आरोपावरून आसाममधील राजकारण तापले आहे. भाजपने हे आरोप बिनबुडाचे आणि सूडबुद्धीने प्रेरीत असल्याचे म्हटले आहे.

“कुत्र्यासारखे भुंकतायत”; पत्नीचा संताप आणि एफआयआर

आपल्यावरील आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पवन खेडा यांच्या विरोधात पोलिसांत धाव घेत एफआयआर दाखल केली आहे. आपली बाजू मांडताना त्यांनी अत्यंत कठोर शब्द वापरले. “काही लोक केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी कुत्र्यासारखे भुंकत आहेत,” अशा शब्दात त्यांनी खेडा यांचा समाचार घेतला. त्यांच्या या विधानामुळे राजकारणातील सभ्यतेची पातळी आणखी खाली घसरल्याची टीका होत आहे.

आसाम पोलीस दिल्लीत; अटकेची टांगती तलवार

केवळ शाब्दिक युद्ध न थांबता आता हे प्रकरण अटकेपर्यंत पोहोचले आहे. दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत आसाम पोलिसांचे एक विशेष पथक पवन खेडा यांना ताब्यात घेण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचले आहे. यामुळे राजधानीत राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने या कारवाईला ‘लोकशाहीची हत्या’ आणि ‘सूडाचे राजकारण’ असे संबोधले आहे.

राजकारणाची घसरलेली पातळी: चिंतेचा विषय

एकीकडे विकास आणि धोरणांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, दुसरीकडे वैयक्तिक उणीदुणी काढणे, कुटुंबावर टीका करणे आणि ‘वेडा’, ‘कुत्रा’ यांसारख्या शब्दांचा वापर करणे यामुळे भारतीय राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याचा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.

—xx—

Share.
Leave A Reply

Exit mobile version