Spread the love

अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून, या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धव ठाकरे गटातील खासदारांना आपल्या पक्षात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या वृत्ताचे ठाकरे गटाकडून ठामपणे खंडन करण्यात आले आहे.

दरम्यान, भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सत्ताधारी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सख्ख्या भावासारखे एकत्र काम करत आहेत. आमचे सरकार अत्यंत विश्वासाने आणि एकदिलाने काम करत आहे. फोडाफोडी करणे आमच्या रक्तात नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बावनकुळे यांनी यावेळी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडताना महायुतीचा धर्म उद्धव ठाकरे यांनीच मोडला असल्याचा आरोप केला. “उद्धव ठाकरे यांनी महायुती सोडून काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यांच्या सरकारच्या काळात आमदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच अनेक आमदारांनी पक्ष सोडला,” असे ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “आज महाराष्ट्रात 217 आमदारांचे मजबूत सरकार आहे. हे सरकार एकदिलाने काम करत असून विकासाला प्राधान्य देत आहे.” याचबरोबर खासदारांच्या भेटीगाठींवरून निर्माण होणाऱ्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. “कोणताही आमदार किंवा खासदार सरकारमधील नेत्यांना भेटला, तर त्याचा अर्थ राजकीय हालचाली असा होत नाही. ते आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठीच येतात. त्यामुळे अशा भेटींवरून संशय घेणे चुकीचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या योजनेविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यभरात विविध टप्प्यांत शिबिरे आयोजित केली जात असून, 10 एप्रिल रोजी 450 हून अधिक शिबिरे पार पडली आहेत. पुढील टप्पे 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे रोजी होणार आहेत.

या शिबिरांद्वारे शासनाच्या तब्बल 48 योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. “पणन रस्ते, तुकडेबंदी कायदा, पट्टे वाटप, स्वामित्व योजना अशा विविध उपक्रमांद्वारे सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत तीन शिबिरांद्वारे सुमारे 25 हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला असून, आगामी शिबिरांत आणखी 25 हजार कुटुंबांपर्यंत योजना पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, येत्या काळात या घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version