Spread the love

33 वर्षानंतर मराठवाड्यात पहिला मोठा भूकंप?

महाराष्ट्र : विदर्भ आणि मराठवाडा या भागात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वाशिम शहरातील काही भागांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरात आणि नांदेड शहर व परिसरात हे हलके धक्के बसले. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला. भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्यानंतर जमीन हलल्यासारखे जाणवले अशी माहिती नागरिकांनी दिली. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हे धक्के जाणवलं आहे. अशातच आता खगोलशास्त्र अभ्यासक डॉ श्रीनिवास औंधकर यांनी या भूकंपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी मराठवाड्यातील या भूकंपाबाबत बोलताना म्हटले की, आज सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत या भागात 30 टक्के धक्के बसले आहेत, याची नोंद घेऊन प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे.

पुढे बोलताना औंधकर यांनी म्हटले की, यापूर्वी 4.5 रिश्टर स्केलचे तीन धक्के नोंदले गेले होते, मात्र आज 4.7 ची नोंद झाली आहे. यामुळे सुमारे 30 ते 35 टन ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी काळात हे धक्के वाढत गेले, तर मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हैदराबादमध्ये NGRI तसेच नांदेड विद्यापीठात भूकंपशास्त्राशी निगडित तज्ञ आहेत. त्यांच्या सहकार्याने हिंगोली भागातील भूकंपप्रवण क्षेत्राचा भौगोलिक सर्वे करून नेमके कारण शोधले पाहिजे. 30 ऑक्टोबर 1993 रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतर मराठवाड्यातील हा पहिला मोठा भूकंप मानला जाऊ शकतो.

भूकंपरोधक बांधकामाकडे वळण्याची गरज
मराठवाड्याचील लोकांनी भूकंपरोधक बांधकामाकडे वळले पाहिजे का? यावर बोलताना औंधकर यांनी म्हटले की, नक्कीच, पण बांधकाम करताना संपूर्ण आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. बहुतांश ठिकाणी विटांचे बांधकाम केले जाते. विटांच्या बांधकामाची घरे पडलेली आहेत, तर मजबूत बांधकाम असलेल्या घरांवर फारसा परिणाम झालेला नाही. त्या भागात भूकंपरोधक घरबांधणीला प्राधान्य दिले पाहिजे. माती व दगडाची घरे या काळात पडतात, त्यामुळे आता सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.’

भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे
या भूकंपाचे भूगर्भीय कारण काय यावर बोलताना औंधकर म्हणाले की, मागील काळात पाऊस कसा पडला? जमिनीखाली पाण्याचा साठा कसा आहे? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणारी संस्था हैदराबादमध्ये आहे. तेथील अधिकारी लहान-मोठ्या भूकंपांची नोंद घेऊन त्यामागील कारणांचा शोध घेतात. त्यामुळे भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता तपासता येईल.’

लिगो प्रकल्पाला काही अडचण येऊ शकते का यावर बोलताना औंधकर यांनी सांगितले की, लिगो प्रकल्पाला साधारणपणे 2017-18 साली मंजुरी मिळाली आहे. हा जागतिक प्रकल्प हिंगोलीच्या गांगलवाडी भागात उभारला जात आहे. मंजुरी देताना या भागात भूकंप होणार नाहीत, असा विचार होता. मात्र 2020 नंतर भूकंपांची मालिका दिसून येत आहे. भूकंप नसलेल्या क्षेत्रात ही वेधशाळा उभारण्याचा विचार होता, त्यामुळे आता या बाबतीत पुन्हा निर्णय घेताना विचार केला जाईल.’

प्राण्यांना भूकंपाचे संकेत मिळतात का?
प्रशासनाने काय खबरदारी घेतली पाहिजे या प्रश्नावर बोलताना औंधकर म्हणाले की, भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे, तो झाल्यानंतरच त्याची जाणीव होते. पुढील अर्ध्या तासात भूकंप होणार आहे, असे अचूक सांगणारी कोणतीही यंत्रणा जगात नाही. वर्षाकाठी पृथ्वीवर सुमारे 15,000 भूकंपाचे धक्के बसतात. साधारणतः 5 ते 5.5 रिश्टर स्केलच्या पुढे गेल्यास ते मनुष्याला हानिकारक ठरू शकतात. पक्षी आणि प्राण्यांना भूकंपाचे संकेत मिळतात का? यावर बोलताना त्यांनी म्हटले की, काही पक्षी, वटवाघुळे आणि हत्ती यांना संवेदनशीलता अधिक असते. भूकंपाच्या तरंगांची जाणीव पक्षी व प्राण्यांना आधी होते.’

Share.
Leave A Reply

Exit mobile version