च-होली येथे जयंतीनिमित्त व्याख्यान; विचारांची ज्वाला पेटवणारा प्रभावी कार्यक्रम
पुणे (एस.एन. नांदेडकर) : च-होली येथे तथागत वेल्फेअर फाउंडेशन व सप्तगड भीम महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात अँड. नितीन घोडके यांचे प्रभावी, विचारप्रवर्तक आणि विद्रोही मार्गदर्शनपर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
“पुस्तकातील ज्ञानसागर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर,” असे ठाम प्रतिपादन करत अँड. घोडके यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची व्यापकता आणि कालातीत महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्धच्या लढ्याचा, हिंदू कोड बिलातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा तसेच आजच्या तरुण पिढीतील दिशाहीनतेचा मुद्दा थेट आणि स्पष्टपणे मांडला.
“भारतरत्न ते विश्वरत्न” हा प्रवास केवळ सन्मानाचा नसून संघर्ष, त्याग आणि विद्रोहाचा आहे, हे त्यांनी ठासून सांगितले. रमाईंच्या जीवनातील प्रसंग उलगडताना सभागृहातील महिला वर्गाच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर “सर्वकाही आंबेडकर” या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. त्यांच्या भाषणाने उपस्थितांना केवळ माहितीच दिली नाही, तर विचारांची ज्वाला पेटवण्याचे काम केले.
या कार्यक्रमास तथागत वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, खजिनदार सदानंद उदागे, सचिव राजू इंगळे, सल्लागार प्रविण सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र ढगे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष धनराज मनोहर, खजिनदार समाधान ओव्हाळ, सचिव सचिन कांबळे उपस्थित होते. तसेच अशोक गायकवाड, राजेश आखाडे, सोमनाथ कांबळे, प्रभाकर सूर्यवंशी, जीवन कांबळे, अरविंद केदारी, चिलवंत, गोंडगे, मोरे साहेब, कुसळे साहेब, निकम साहेब, सनी गवई, वानखेडे सर, वनकर सर, रोकडे साहेब, गायकवाड सर आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे राज्य प्रतिनिधी प्रशांत देठे, संघशिल भद्रे यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते, महिला वर्ग आणि तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची मालिका राबवण्यात आली. ११ एप्रिल रोजी यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले, तर १५ एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. पुढे २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायिका आई कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, ही मैफल प्रेरणादायी ठरणार आहे. या सर्व वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जयंती उत्सवाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रंगनाथ वाघमारे यांनी दिली.
