Spread the love

संविधानाच्या कलम १चा संदर्भ देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; च-होली येथे फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम

पुणे  (एस. एन. नांदेडकर) : च-होली येथे तथागत वेल्फेअर फाउंडेशन आणि सप्तगड भीम महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात “इंडिया अर्थात भारत हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे,” असा ठाम संदेश स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व राज्यघटना अभ्यासक संघशिल भद्रे (एस. एन. नांदेडकर) यांनी दिला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला उपस्थित नागरिक, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल नवचेतना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संघशिल भद्रे यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेच्या कलम १चा उल्लेख करत “India, that is Bharat, shall be a Union of States” या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला. ‘इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असली, तरी ‘भारत’ हा आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा आत्मा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ही दुहेरी ओळख अभिमानाने स्वीकारून जगासमोर मांडली पाहिजे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांचा संच नसून ती समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जीवनशैली आहे. “हा देश केवळ एका धर्माचा नसून सर्व धर्मांचा आहे,” असे सांगताना त्यांनी सर्वधर्मसमभावाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देत समाजात एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याचे काम राज्यघटना करते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तथागत वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, खजिनदार सदानंद उदागे, सचिव राजू इंगळे, सल्लागार प्रविण सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र ढगे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष धनराज मनोहर, खजिनदार समाधान ओव्हाळ, सचिव सचिन कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

याशिवाय, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे राज्य प्रतिनिधी व पुणे जिल्हा समन्वयक, सुप्रसिद्ध व्याख्याते अँड. नितीन घोडके, प्रशांत देठे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष आकर्षण ठरली. महिला वर्ग, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत मूल्यांबाबत व्यापक जनजागृती झाली. “इंडिया अर्थात भारत” ही ओळख केवळ शब्दांपुरती न राहता ती प्रत्येकाच्या आचरणात उतरवण्याची गरज असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मता, संविधाननिष्ठा आणि राष्ट्रीय अभिमान अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version