Spread the love

मुख्य आरोपी विशाल अहिरेसह साथीदारांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाईचा आग्रह; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे शहराध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंद सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना निवेदन सादर करत मुख्य आरोपी विशाल राजू अहिरे व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता मुकुंद सपकाळे हे रिंगरोडने जात असताना ५ ते ६ मोटारसायकलींवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून चारही बाजूंनी घेराव घातला. त्यानंतर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या आणि सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात विशाल अहिरे, पराग लोहार यांच्यासह इतर आरोपी सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन, व्याख्याने व इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘Dharmveer Anand Dighe Civic Assistance Cell’ — Inauguration

सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, घटनेला अनेक दिवस उलटूनही मुख्य आरोपींसह इतरांना अटक करण्यात आलेली नाही. उलट फिर्यादी व साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला. “सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात ती करण्यात आली नाही. त्यामुळेच आरोपींना गुन्हा करण्याचे धाडस झाले,” असे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व आरोपींना २४ तासांत अटक करून त्यांच्यावर स्थानबद्धतेची तसेच ‘मोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच जर आरोपींना यापूर्वी जामिनावर सोडण्यात आले असेल, तर त्यांचा जामीन तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version