Spread the love

कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप

मोहने  (संदी शेंडगे ) : मोहने येथील रहिवासी आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असलेले सुरक्षारक्षक भाऊराव कांबळे यांचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मृत्यूमागे कामाच्या अतिताणाची गंभीर पार्श्वभूमी असल्याचा आरोप भाऊराव चे भाऊ श्रीकांत कांबळे व नातेवाईकांनी केला आहे.

भाऊराव कांबळे हे वसंत व्हॅली येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. सलग दोन दिवस ते कामावरच होते आणि बारा-बारा तासांच्या दोन शिफ्ट पूर्ण केल्यानंतरही एजन्सीच्या आग्रहाखातर त्यांनी तिसरी शिफ्ट स्वीकारली होती. अत्यंत थकलेल्या अवस्थेत शुक्रवारी आंघोळ करून पुन्हा कामावर येतो असे सांगून ते सकाळी घरी परतत होते. त्यांनी वसंत व्हॅली सोसायटीहून शहाडपर्यंत रिक्षाने प्रवास केला आणि तेथून आंबिवलीकडे जाण्यासाठी रेल्वेत चढले. मात्र शहाड-आंबिवली दरम्यान उल्हास नदीवरील पुलावरून रेल्वे जात असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. शनिवारी त्यांचा मृतदेह उल्हास नदीत आढळून आला, पोलिसांच्या प्राथमिक अहवालातून रेल्वेतून पडून मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.

नातेवाईकांच्या मते, शहाड ते आंबिवली धर्मांचे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळावे त्यांच्या मोबाईलची लोकेशन महारळ येथे दाखवत असल्याने कुटुंबीयांनी मृत्यू बाबत शंका व्यक्त केली आहे त्यांचा घातपात झाला किंवा रेल्वे अपघात झाला याचा पोलिसांनी खुलासा करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे तसेच कामाच्या अति ताना मुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांचे भाऊ श्रीकांत कांबळे यांनी केला आहे. “जर त्यांना एवढा कामाचा ताण दिला नसता, तर आज भाऊराव आपल्यात असते.” त्यांनी संबंधित सुरक्षा एजन्सी मालकावर गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे.

या घटनेने सुरक्षा रक्षकांच्या कामाच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नियमानुसार आठ तासांची शिफ्ट असतानाही अनेक ठिकाणी कामगारांकडून 12-12 तास, कधी कधी 36 ते 48 तास सलग काम करून घेतले जाते. अशा अमानवी ताणामुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, काही वेळा त्याचे दुर्दैवी परिणाम जीवघेणे ठरत आहेत. राज्य सरकारने सुरक्षारक्षकांच्या सुरक्षा कडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यांच्या कामाचे तास आणि त्यांच्याकडून करून घेत असलेल्या अतिरिक्त कामामुळे सुरक्षारक्षकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सरकारने एक नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे.
दरम्यान, या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र भाऊराव कांबळे यांच्या मृत्यूने एक ज्वलंत प्रश्न उभा केला आहे — “कामगारांच्या जीवाची किंमत नेमकी किती?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version