Spread the love

५० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षणाची संधी; खानदेशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

UPSC–MPSC–JEE–NEET साठी मोफत प्रशिक्षण | ३००+ विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा | समाजोपयोगी उपक्रमाला मान्यवरांचा पाठिंबा

जळगाव : “बुद्धिमान आणि संस्कारशील युवक हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करणारा सक्षम युवक घडवणे हेच आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन जनार्दन महाराज यांनी केले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर आणि नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियाना’च्या प्रवेश परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांत हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. समाजातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
या महाअभियानांतर्गत ५० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, त्यांना UPSC, MPSC, JEE आणि NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला राजूमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, नगरसेवक नरेंद्र पाटील, तसेच ग्लोबल मिशन स्कूलचे चेअरमन मनोहर पाटील आणि नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार राजूमामा भोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्प हा जळगाव जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळेल.” शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनीही एका आध्यात्मिक संस्थेने शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले.

प्रवेश परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
या महाअभियानाच्या प्रवेश परीक्षेस खानदेशभरातून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रश्नपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश पाटील यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील, अक्षय देवरे, विवेक साळुंखे, तुषार पाटील, प्रशांत तायडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच, ‘सतपंथ शिष्यवृत्ती महाअभियान’ हा सामाजिक बांधिलकी जपणारा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणारा उपक्रम म्हणून पुढे येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version