Spread the love

रामदास आठवले यांच्या हस्ते सोहळा; रमाईंच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या विचारांची स्मृती जपणारा प्रकल्प

पुणे : पिंपरी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी’ प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी त्यांनी माता रमाईंच्या त्याग, समर्पण आणि संघर्षमय जीवनाचा गौरव करत हा प्रकल्प केवळ वास्तू नसून सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत ठरेल, असे प्रतिपादन केले.

रमाईंचा त्याग: इतिहासाला दिशा देणारी शक्ती
“त्यागमूर्ती माता रमाई या संघर्ष आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या कार्याला भक्कम साथ दिली. बाबासाहेबांनी देशाला विचार, संविधान आणि स्वाभिमान दिला, तर त्या विचारांना उभे राहण्यासाठी रमाईंच्या निःस्वार्थ साथीची मोठी भूमिका होती,” असे आठवले म्हणाले.

प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते.

शायरीतून बाबासाहेबांना अभिवादन
कार्यक्रमात रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत शायरी सादर करत बाबासाहेबांना अभिवादन केले.

“बाबासाहेबांकडे नव्हती पैशांची कमाई,
पण त्यांच्या मागे उभी होती रमाई…
माझा भीम आहे चमकता तारा,
त्याचा अपमान केला तर वाजवू बारा…”

या शायरीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मानवमुक्तीच्या चळवळीचा गौरव
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेली चळवळ ही केवळ एका घटकापुरती मर्यादित नव्हती, तर ती संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीसाठी होती. त्यांच्या कार्यामुळेच आज आपल्याला समानतेने जगण्याचा आणि विचार मांडण्याचा अधिकार मिळाला आहे,” असेही आठवले यांनी नमूद केले.

प्रेरणादायी स्मारक ठरणार
पिंपरीत उभारण्यात येणारी ‘माता रमाई आंबेडकर सृष्टी’ ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, त्याग, स्त्रीशक्ती आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची जपणूक करणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version