Spread the love

३५० गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर; ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळला

बेळी : श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथील सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर संस्थान अंतर्गत असलेल्या भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेच्या चारा गोदामाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. कडक उन्हामुळे लागलेल्या या आगीत मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला.

दुपारी अचानक लागली आग
शुक्रवारी दुपारी सुमारे १.३० वाजता, प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर गोशाळेतील वाळलेल्या चाऱ्याच्या गोडाऊनला अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग आणि कोरडा चारा यामुळे काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत अंदाजे १०० आयशर इतका चारा भस्मसात झाला.

युद्धपातळीवर बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, तरुण मंडळ व संस्थेचे सेवेकरी घटनास्थळी धावले. योगेश पाटील यांनी तातडीने नशिराबाद अग्निशमन दल पाठवले. अग्निशमन दल व नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. तसेच, जेसीबीच्या मदतीने उर्वरित चारा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. वेळेत मदत पोहोचल्याने मोठी हानी टळली.

गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
या गोशाळेत सध्या ३०० ते ३५० गायींचा सांभाळ केला जातो. उन्हाळ्यामुळे आधीच चाऱ्याची टंचाई असताना, आता मोठा साठा नष्ट झाल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

मदतीचे आवाहन
या संकटातून सावरण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि गोभक्तांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चारा किंवा आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी थेट संस्थेशी संपर्क साधावा, असे गोसेवकांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version