Spread the love

धम्मपूजा, उपदेश आणि शिस्तबद्ध मिरवणुकीतून गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी

नशिराबाद : नशिराबाद येथे बौद्ध पंच मंडळाच्या वतीने गौतम बुद्ध यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्यात भव्य कॅन्डल मार्च, धम्मपूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर बुद्धमय झाला होता.

धम्मपूजेसह कार्यक्रमाची मंगल सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता बौद्ध धर्मगुरू भंतेजी अभिचित्त थेरो यांच्या हस्ते धम्म त्रिसूत्र पठण आणि धम्मपूजेद्वारे झाली. यावेळी धम्मध्वजाचे पूजन करण्यात आले. शांत आणि आध्यात्मिक वातावरणात उपासकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. दुपारच्या सत्रात सामूहिक भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बुद्धाचार्य तुषार रंधे यांनी उपस्थितांना धम्माचे महत्त्व आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणींचा सामाजिक जीवनावर होणारा प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले.

कॅन्डल मार्चने वेधले सर्वांचे लक्ष
संध्याकाळी आयोजित भव्य कॅन्डल मार्च हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला. पांढऱ्या शुभ्र वेशात सजलेले उपासक-उपासिका हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी झाले होते. भवानीनगर येथील तथागत बुद्ध विहारापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. जयंती समितीचे अध्यक्ष अभय सपकाळे यांच्या हस्ते गौतम बुद्ध तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विश्वशांती बुद्ध विहारात समारोप
‘बुद्धम् शरणम् गच्छामि’च्या घोषणांनी आणि पुष्पवृष्टीत निघालेली ही मिरवणूक मुक्तेश्वर नगर येथील विश्वशांती बुद्ध विहारात पोहोचली. तेथे बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता शांततेच्या संदेशासह करण्यात आली.

मोठ्या संख्येने उपस्थिती
या सोहळ्याचे सूत्रसंचालन सतीश सावळे यांनी केले, तर आनंदा रंधे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नशिराबाद आणि परिसरातील बौद्ध बांधव, भगिनी व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या भव्य आयोजनातून गौतम बुद्ध यांच्या शांतता, करुणा आणि समतेच्या संदेशाचा जागर झाला असून, समाजात बंधुता आणि एकात्मतेचा भाव दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version