Spread the love

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शासनाचा निर्णय; सत्तेचा संपूर्ण समीकरण बदलण्याची चिन्हे

भुसावळ (करण शिंदे ): भुसावळच्या राजकारणात मोठा धक्का देणारी घटना समोर आली असून, नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना राज्य शासनाने थेट अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भुसावळ नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे गायत्री भंगाळे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी रजनीताई सावकारे यांचा पराभव करत सत्तेवर कब्जा मिळवला होता. मात्र, निवडणुकीनंतर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आणि त्यातूनच हा वाद निर्माण झाला.

चौकशीत धक्कादायक निष्कर्ष
तक्रारीनंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेले. सखोल चौकशीनंतर समितीने संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. २३ एप्रिल रोजी हा निर्णय स्पष्ट करण्यात आला असून त्यानंतर शासनाने तात्काळ कारवाई करत भंगाळे यांना अपात्र घोषित केले. हा आदेश राज्य शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही अपात्रता “भूतलक्षी प्रभावाने” लागू करण्यात आली असून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता
या निर्णयामुळे भुसावळ नगरपालिकेतील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

नागरिकांकडून सवालांची सरबत्ती
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत—
निवडणुकीपूर्वीच जात पडताळणी का झाली नाही?
प्रशासनाने एवढा गंभीर मुद्दा दुर्लक्षित कसा केला?
आता नव्या नेतृत्वाची निवड कशी आणि कधी होणार?

“एक प्रमाणपत्र… आणि सत्तेचा डाव उलथला”
एका जात प्रमाणपत्राच्या वादामुळे संपूर्ण सत्तेचा डाव उलथल्याचे चित्र समोर आले आहे. भुसावळच्या राजकारणात आता पुढे काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version