Spread the love

तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणी सर्वपक्षीय एकवटले; न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

एरंडोल, जि. जळगाव : : करण शिंदे (गुरु)
नसरापूर येथे तीन वर्षीय निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असताना एरंडोल शहरात या संतापाचा जणू स्फोटच झाला. अमानुष कृत्याविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि “आरोपीला फाशी द्या” असा थेट एल्गार केला.

शहरातील वातावरण पूर्णतः संतप्त झाले होते. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. “ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे”, “निर्दोष बालिकेला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत होत्या.

पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर शिक्षेची मागणी

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना निवेदन देत ठोस मागण्या मांडल्या:

* आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी
* प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे
* पीडितेला त्वरित व पूर्ण न्याय मिळावा

यावेळी “न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.

महिलांचा आक्रोश; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

या आंदोलनात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. “आज बालिका सुरक्षित नाही, तर समाज सुरक्षित कसा?” असा सवाल उपस्थित करत महिलांनी संताप व्यक्त केला.
महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, कडक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संवेदनशील भागात कडक बंदोबस्ताची मागणी

शहरातील धरणगाव चौफुली उड्डाणपूल, म्हसावद नाका, रंगारी खिडकी ते गांधीपुरा परिसर, अंजनी नदीवरील पूल तसेच शाळा व महाविद्यालय परिसरात रात्रीच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

या निषेध आंदोलनात डॉ. नरेंद्र ठाकुर, देविदास नहाजन, किशोर निंबाळकर, अमित पाटील, विजय महाजन, जगदीश पाटील, विशाल सोनार, प्रसाद दंडवते, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रशासनावर वाढता दबाव

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी” आणि “महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत” अशा मागण्या अधिक तीव्र होत आहेत. एरंडोलमध्ये उसळलेला हा संताप आता प्रशासनावर थेट दबाव निर्माण करत आहे.

एकंदरीत, ही घटना केवळ निषेधापुरती मर्यादित न राहता न्यायासाठीच्या आक्रमक लढ्याचे रूप धारण करत असून, “गुन्हेगारांना वाचवले जाणार नाही, शिक्षा होणारच” असा ठाम संदेश एरंडोलमधून दिला जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version