Spread the love

मनोज महाराज राजपूत ऐनगावकर यांच्या भागवत कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन वर्षांत ५०० युवक-युवती वारकरी मार्गावर

पारोळा (सुरेश पाटोळे) : तालुक्यातील खेडीढोक गावात आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाने गावातील युवा पिढीला नवी दिशा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भागवत कथेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार आणि निर्व्यसनी जीवनाचा संदेश देण्यात येत असून गेल्या दोन वर्षांत तब्बल ५०० युवक-युवतींनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार करत व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग निवडला आहे.

ह.भ.प. मनोज महाराज राजपूत ऐनगावकर यांनी या भागवत कथेचा समारोप करताना युवा पिढीला अध्यात्म आणि सदाचाराची जोड देण्याची गरज अधोरेखित केली. पालखी सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, “भागवत कथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून माणसातला माणूस जागा करण्याचा प्रयत्न आहे. समाजातील तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असताना कथा, कीर्तन आणि वारकरी संस्कारांच्या माध्यमातून त्यांना योग्य दिशा मिळत आहे.”

धर्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संगम
श्री हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सवानिमित्त ३ ते १० मे दरम्यान खेडीढोक येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात रामायण, श्रीकृष्ण लीला, धार्मिक प्रसंग आणि अध्यात्मिक देखावे सादर करण्यात आले. सजीव झाक्यांमधून धार्मिकता, संस्कृती आणि नैतिकतेचे संदेश देण्यात आले.

मनोज महाराज म्हणाले की, “गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कथा-कीर्तन करत धर्म आणि संस्कृती जपण्याचे कार्य सुरू आहे. मात्र आजच्या काळात माणसातील माणूस जिवंत ठेवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. भागवत कथा समाजाला एकत्र आणते आणि व्यसनांपासून दूर ठेवण्याची प्रेरणा देते.”

दोन वर्षांत ५०० युवक वारकरी मार्गावर
गेल्या वर्षी आयोजित भागवत कथेनंतर गावातील सुमारे ३०० युवक-युवतींनी वारकरी माळ धारण करत व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला होता. यंदाही आणखी २०० युवक-युवतींनी कथा श्रवणातून वारकरी होण्याचा निर्धार केला. त्यामुळे खेडीढोक गावात सामाजिक परिवर्तनाचे सकारात्मक चित्र निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कथेच्या प्रभावाने बदलले गावाचे वातावरण
गावातील अनेक युवक पूर्वी विविध व्यसनांच्या आहारी गेले होते. मात्र आठ दिवसांच्या भागवत कथेने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणल्याचे ग्रामस्थ सांगतात. व्यसनमुक्त झालेल्या युवकांमुळे अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावात शांतता, भक्ती आणि संस्कारांची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

ग्रामस्थांचे परिश्रम आणि सहकार्य
भागवत कथा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक महेंद्र महाराज, रामेश्वर महाराज, पॅडवादक भूषण महाराज नेवासा, तबलावादक कुमार गिरी महाराज कन्नड, आर्गनवादक चेतन महाराज उंदीरखेडे, झाकी प्रदर्शन प्रमुख नितीन महाराज विटनेरकर, प्रदीप राजपूत तसेच खेडीढोक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिकतेसोबतच समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या भागवत कथेमुळे खेडीढोक गावात अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version