दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने वह्या, दप्तर, गणवेशासह विविध साहित्याचे वितरण
रोटवद | प्रतिनिधी प्रशांत शिंदे
शिक्षणाची गोडी वाढावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि समाजात दातृत्वाची भावना रुजावी, या उद्देशाने रोटवद येथील ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी ‘शालेय साहित्य भेट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
स्वर्गीय कोकिळाबाई रमेश महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला. भूषण महाजन (इंजिनिअर, एरंडोल), रमेश महाजन, उल्हास लढ्ढा, पंकज काबरा, भूषण बियाणी, चंदन पाटील, गजराज गोपाल (सर्व एरंडोल) तसेच सीए सुरेश पाटील (जळगाव) यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, वॉटर बॉटल, कंपास, शालेय गणवेश आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष जानकीराम पाटील होते. नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद सचिव सुनीलजी गरुड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका महंत मॅडम यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला रोटवद, गोंदेगाव, निशाणे आणि पिंपळे येथील पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानातून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सुनील पुरी यांच्या प्रयत्नातून समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी प्रेरणा मिळण्याबरोबरच समाजातील सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले, तर कापडे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
