Spread the love

‘पवित्र’ पोर्टल शिक्षक भरती २०२६ मध्ये उमेदवारांची फसवणूक झाल्याचा आरोप; कृती समिती आक्रमक

११ वी-१२ वीच्या जागांबाबत संभ्रम; भरती प्रक्रिया पारदर्शक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

विशेष प्रतिनिधी :
‘पवित्र’ पोर्टल शिक्षक भरती २०२६ प्रक्रियेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण उमेदवारांची फसवणूक होत असल्याचा आरोप कृती समिती, महाराष्ट्र राज्यने केला आहे. नवीन संचमान्यता सुधारणांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीतील जागांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी असून, पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

कृती समितीचे राज्याध्यक्ष एस. एम. नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना, आगामी शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात ११ वी व १२ वीच्या वर्गांसाठी एकही जागा उपलब्ध होणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याचा दावा केला. जर उच्च माध्यमिक स्तरावरील जागा भरण्यात येणार नसतील, तर शासनाने TAIT परीक्षा घेऊन उमेदवारांकडून परीक्षा शुल्क का घेतले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नवीन संचमान्यता नियमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच यामुळे डी.एड., बी.एड. आणि TAIT पात्र उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना व्यक्त केली.

एस. एम. नागपुरे म्हणाले, “नवीन सुधारणांच्या नावाखाली उमेदवारांची दिशाभूल केली जात आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली पाहिजे. राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा कृती समिती राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल.”

कृती समितीने शासनाकडे पवित्र पोर्टलवरील सर्व रिक्त जागांची माहिती जाहीर करून भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या वृत्तातील आरोप आणि मागण्या या कृती समितीच्या निवेदनावर आधारित असून, याबाबत शासन किंवा शिक्षण विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Share.
Leave A Reply

Exit mobile version