Spread the love

दुर्गेश महाजन यांच्या स्मृतीतून चामकवाडीत समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ) :
दुःखाला समाजसेवेची दिशा मिळाली तर स्मृती चिरंतन होतात, याची हृदयस्पर्शी प्रचिती भडगाव तालुक्यातील चामकवाडी (कजगाव) येथे पाहायला मिळाली. दिवंगत दुर्गेश भानुदास महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद वस्तीशाळेत विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप आणि वृक्षारोपण अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आली.

माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार भानुदास हिलाल महाजन यांनी सहकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत ये-जा करता यावी या उद्देशाने दर्जेदार रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच शाळा परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून “एक झाड – एक जबाबदारी” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सादिक गणी मन्यार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद लालवाणी, सरपंच विजय गायकवाड, पत्रकार बी. बी. भोसले, निलेश महाले, दिपक अमृतकर, अमीन पिंजारी, समाधान पाटील, आशुतोष पाटील, श्रेयश कासार, नितीन पाटील, तसेच माजी उपसरपंच शिवप्रसाद भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंत पाटील यांनी केले. समाजाच्या सहकार्यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास शक्य होत असल्याचे सांगत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाबाबतची जबाबदारीही विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक बालू सोनवणे, एकनाथ भोई, निल चौधरी, सोपान महाजन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत दुर्गेश महाजन यांच्या स्मृतींना अभिवादन करत महाजन कुटुंबाने वैयक्तिक दुःखाचे रूपांतर समाजसेवेत केले, हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

रेनकोट वाटपामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाणे अधिक सुरक्षित होणार असून वृक्षारोपणामुळे शाळेचा परिसर हिरवागार होण्यास हातभार लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरला.

“फुलांचा हार काही क्षणात कोमेजतो; पण एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि लावलेल्या झाडाचा वाढता हिरवा श्वास हीच दिवंगत व्यक्तीला वाहिलेली सर्वात जिवंत श्रद्धांजली ठरते.”

Share.
Leave A Reply

Exit mobile version