महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची शासनाकडे मागणी; अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख
जनगणना कामादरम्यान अपघातात कर्मचाऱ्यांचा मृत्यू | “राष्ट्रीय काम करताना कर्मचारी शहीद” – संघटनेची भूमिका | शासनाकडे विमा संरक्षणाची मागणी
भडगाव : राज्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेत कार्यरत सर्व प्रगणकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने शासनाकडे केली आहे. जनगणनेच्या कामादरम्यान अकोला आणि लातूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांचा उल्लेख करत संघटनेने ही मागणी लावून धरली आहे.
भर उन्हात जनगणनेचे काम
शासनाच्या वतीने सध्या जनगणनेचे काम सुरू असून विविध शासकीय कर्मचारी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. भर उन्हाळ्यात कर्मचारी घराघरांत जाऊन माहिती संकलनाचे काम करत आहेत. हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
अपघातात कर्मचाऱ्यांचा मृत्यू
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आरोग्य विभाग प्रमुख संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की, जनगणनेचे काम करून घरी परतत असताना अकोला आणि लातूर येथील शिक्षक कर्मचाऱ्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
“जनगणनेचे काम हे राष्ट्रीय काम असल्याने हे कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडले. त्यामुळे त्यांना एक प्रकारे शहीद मानले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
५० लाख विमा संरक्षणाची मागणी
राज्यात जनगणनेचे काम करणाऱ्या सर्व प्रगणक कर्मचाऱ्यांना किमान ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कामादरम्यान अपघात, उष्माघात किंवा इतर आपत्तीजन्य परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असेही संघटनेने म्हटले आहे.
शासन दरबारी पाठपुरावा करणार
या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची माहिती संजय सोनार कळवाडीकर यांनी दिली. जनगणनेसारखे महत्त्वाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
