प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पाजले ‘दोन थेंब जीवनाचे’; नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन
पहूर, ता. जामनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, पहूर यांच्या वतीने पहूर बसस्थानक व ग्रामपंचायत परिसरात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे ‘दोन थेंब जीवनाचे’ पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
पोलिओमुक्त आणि निरोगी भारत घडविण्याच्या उद्देशाने आयोजित या मोहिमेत प्रत्येक बालकापर्यंत पोलिओची लस पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पालकांना आपल्या मुलांचे वेळेत लसीकरण करून या जनहिताच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सरपंच पती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे, चेतन रोकडे, ग्रामपंचायत सदस्य, औषध निर्माण अधिकारी मनीष जाधव, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच राजू जाधव आणि माजी प्रशासनक रामचंद्र वानखेडे यांनी पालकांना संबोधित करत सांगितले की, “० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये. प्रत्येक पालकाने जागरूक राहून आपल्या पाल्याला पोलिओचे दोन थेंब पाजावेत. निरोगी समाजासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.”
अभियानाच्या माध्यमातून ‘पोलिओमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
