धरणगाव : क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृती स्मरण दिना प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय ‘ क्रांतिकारी खाज्याजी नाईक’ स्मृती कलश यात्रा’ आज धरणगाव येथून भक्तिभावाने प्रारंभ झाली असून, धरणगाव, चोपडा आणि शिरपूर या तीन तालुक्यांतून प्रवास करत ११ एप्रिल रोजी आंबापानी येथे समारोप होणार आहे.
या यात्रेमध्ये तीन आकर्षक चित्ररथ स्वरूपातील वाहने सहभागी झाली असून, यात्रेसोबत सुमारे २० कार्यकर्ते तसेच भजनी मंडळ सहभागी झाले आहे. भक्तिमय वातावरणात निघालेली ही यात्रा विविध गावांमध्ये धार्मिक संदेश आणि सामाजिक एकात्मतेचा जागर निर्माण करत आहे. गावोगावी नागरिकांकडून यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, ठिकठिकाणी पूजन आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

९ एप्रिल रोजी धरणगाव तालुक्यातील स्मृती मंदिर, हिंगोणे बु.|| व हिंगोणे खु.||, पिंप्री, हनुमंतखेडे, सोनवद, बाभूळगाव, अहिरे, भामर्डी आणि खर्दे या गावांमधून यात्रा मार्गक्रमण करत नांदेड येथे मुक्कामी थांबली. या टप्प्यात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत यात्रेचे स्वागत केले.
१० एप्रिल रोजी यात्रा चोपडा तालुक्यात प्रवेश करून चहार्डी, मालापूर, बोरअजंटी, वैजापूर, शेनपाणी,
खाऱ्यापाडा, गौऱ्यापाडा, उमरटी आणि मोरचिडा या गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. या दिवशी सत्रासेन येथे यात्रेचा मुक्काम असेल. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर धार्मिक वातावरणात भजन, कीर्तन आणि प्रार्थना सत्रांचे आयोजन केले जात आहे.
११ एप्रिल रोजी यात्रा शिरपूर तालुक्यातील खामखेडा, आंबा, खंबाळा, जायदा, सांगवी, पळासनेर आणि बारवापाडा या गावांमधून पुढे जात आंबापानी येथे समारोप होणार आहे. या अंतिम टप्यातही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या स्मृती कलश यात्रेचा मुख्य हेतू जनजाती समाजात जाणीव जागृती निर्माण करून जनजाती समाजातील क्रांतीकारकांनी या देशासाठी जे बलिदान केले आहे त्याची माहिती व जाणीव जागृती निर्माण व्हावी व क्रांतिकारक खाज्याजी नाईकांचे कार्य जनमानसात पोहोचावे हा हेतू आहे.
क्रांतिकारी खाज्याजी नाईकांचे धरणगाव येथील “शीर” असलेल्या स्मृतीस्थळापासून ते आंबापाणी येथील त्यांचे ”धड”असलेल्या स्मृती स्थळापर्यंतची ही यात्रा जनजाती समाजासाठी प्रेरणादायी आहे.
यात्रेसोबत क्रांतिकारी खाजाजी नाईक संस्थेचे अध्यक्ष भाईदासजी सोनवणे,संचालक सोमनाथ भिल, समीर शिंदे, संजय महाराज, पिंटूभाऊ पावरा,जामलाल महाराज,दत्ता पावरा, सोनू भादले, प्रवीण पवार तसेच जनजाती समाजाचे अनेक कार्यकर्ते व वाटवा पाडा येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
