पगारवाढ, भरतीसह प्रलंबित मागण्यांवरून संघर्ष तीव्र; ग्राहकांना व्यवहार आधीच पूर्ण करण्याचे आवाहन
मुंबई : देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली असून, मे २०२६ मध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. बँक युनियन्स आणि व्यवस्थापन यांच्यातील चर्चेत एकमत न झाल्याने हा संघर्ष तीव्र झाला असून, सलग चार दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संभाव्य संपाचा परिणाम देशभरातील प्रमुख बँकांवर होणार असून, विशेषतः State Bank of India (एसबीआय) च्या शाखांमधील कामकाजावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हा संप झाल्यास शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांसह सलग चार दिवस बँका बंद राहू शकतात.
आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम
या संपामुळे केवळ शाखांमधील व्यवहारच नव्हे, तर धनादेश वटवणे, निधी हस्तांतरण आणि इतर महत्त्वाच्या सेवा ठप्प होऊ शकतात. विशेषतः RTGS आणि NEFT यांसारख्या प्रणालींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यापारी, उद्योगपती आणि सर्वसामान्य खातेदारांना याचा थेट फटका बसू शकतो.
संपामागील प्रमुख कारणे
बँक कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, रिक्त पदांची भरती, कामाच्या तासांचे योग्य नियोजन आणि सेवा अटी सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे.
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना
बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता ग्राहकांनी आपली महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक व्यवहार वेळेत पूर्ण करावेत
एटीएममधून आवश्यक रोकड आगाऊ काढून ठेवावी
चेक क्लिअरन्स किंवा मोठे व्यवहार लांबणीवर टाळावेत
डिजिटल सेवा सुरू राहणार, पण…
संपाच्या काळात नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि YONO App सारख्या डिजिटल सेवा सुरू राहतील. मात्र, तांत्रिक अडचणी आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, बँक संपाचा प्रश्न निकाली निघतो की ग्राहकांना सलग चार दिवस अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे देशभरातील ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
