१५ ते २० दिवसांच्या खंडानंतर बरसला पाऊस; माळेगाव शिवारातील खरीप पिकांना मोठा दिलासा
सोयगाव तालुका। प्रतिनिधी शिवराम जाधव |
सोयगाव तालुक्यातील माळेगाव शिवारात सोमवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके कोमेजू लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.
मात्र, आज झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. विशेषतः कापूस, सोयाबीन, मका आणि इतर खरीप पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पावसामुळे शेतातील ओलावा वाढला असून पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळातही समाधानकारक पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
