अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रतापराव पाटील यांची धाव
तीन तास रेल्वे ठप्प; कडाक्याच्या उन्हात प्रवाशांना दिलासा – २५० पाण्याचे जार वाटप, जीपीएस मित्र परिवाराचे सहकार्य
पाळधी (ता. धरणगाव) : पाळधी रेल्वे स्थानकावर उधना ते हसनपूर ही प्रवासी रेल्वे तब्बल तीन तासांहून अधिक काळ उभी राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सकाळी सुमारे ११ वाजल्यापासून रेल्वे मार्ग मोकळा नसल्यामुळे गाडी स्थानकावरच थांबून राहिली होती. या अनपेक्षित विलंबामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अक्षरशः होरपळून निघत होते. अनेक प्रवाशांकडे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नव्हती. स्थानकावरही पाणी व इतर मूलभूत सुविधांची कमतरता जाणवत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. तहान, उष्मा आणि प्रतीक्षेच्या त्रासामुळे प्रवाशांची अवस्था बिकट बनली होती.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तातडीने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला. कोणतीही विलंब न लावता त्यांनी सुमारे २५० पाण्याचे जार उपलब्ध करून दिले. काही वेळातच स्थानकावर पाण्याचे वाटप सुरू करण्यात आले आणि तहानलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. या मदतकार्यात जीपीएस मित्र परिवारानेही मोलाची भूमिका बजावली. त्यांनी पाण्याचे जार व्यवस्थित पद्धतीने प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले. शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणत्याही प्रवाशाला अडचण येऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली.
या प्रसंगी अनेक प्रवाशांनी प्रतापराव पाटील यांच्या या मानवतावादी कार्याचे मनापासून कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली. “अशा कठीण प्रसंगी मदतीला धावून येणारे लोक आजही समाजात आहेत, हीच खरी माणुसकी आहे,” अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या.
प्रतापराव पाटील यांच्या या कृतीतून त्यांची लोकांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे. संकटाच्या वेळी तत्काळ प्रतिसाद देत लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडली.
पाळधी स्थानकावर घडलेली ही घटना केवळ मदतकार्यापुरती मर्यादित न राहता, समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.
