छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श नेतृत्व, सुशासन आणि राष्ट्रनिष्ठेवर प्रतीक जैन यांचे मार्गदर्शन
धरणगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशानुसार धरणगाव येथील क्रांतिकारी खाज्याजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नवनीत चव्हाण होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रतीक विरचंद जैन उपस्थित होते. यावेळी डी. बी. वाघ यांच्यासह संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना प्रतीक जैन म्हणाले, “तलवारीने जिंकलेला भूभाग इतिहास घडवतो; परंतु संस्कार, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीने घडलेला नागरिक भविष्यातील भारत घडवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे या विचारांचे सर्वोत्तम उदाहरण आहे.”
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिष्ठ, लोककल्याणकारी व न्यायप्रिय शासन, स्वराज्याची संकल्पना, आदर्श नेतृत्व आणि सुशासनाची मूल्ये यांचे सविस्तर विवेचन केले. शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांचा दाखला देत विद्यार्थ्यांना संविधानाप्रती निष्ठा, सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धन, शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले.
स्वराज्य ही केवळ ऐतिहासिक घटना नसून जबाबदार, सुसंस्कृत आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक घडविण्याची अखंड प्रेरणा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
