रायगड-अलिबाग, दि. ०८ ( प्रतिनिधी) :–
परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधीक्षक माधुरी पाटील यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून तो अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर पीएचडीसाठी ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक राहील.
शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ५५ टक्के गुण तसेच पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. परदेशातील विद्यापीठ हे जागतिक क्रमवारीत (QS Rank) पहिल्या २०० मध्ये असणे बंधनकारक आहे. तसेच एकूण जागांपैकी ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे.
या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण शुल्क, इकॉनॉमी क्लास विमानप्रवास (दोन्ही बाजूंचा), निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा तसेच इतर शैक्षणिक खर्च शासनाकडून मंजूर मर्यादेत दिला जाणार आहे. अमेरिका व इतर देशांसाठी वार्षिक USD १५,४०० तर यूकेसाठी GBP ९,९०० इतका निर्वाह भत्ता देण्यात येईल. तसेच पुस्तके, प्रबंध व इतर शैक्षणिक खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक सहाय्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. अपूर्ण अर्जांवर कार्यवाही केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेला अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असणे आवश्यक असून प्रत्येक सत्रात उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. संबंधित विद्यापीठाचे प्रगती अहवाल व गुणपत्रिका वेळेत सादर करणे आवश्यक राहील.
अधिक माहितीसाठी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
