दिवा : येत्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंब्रा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शहरातील विविध जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर आणि अनिल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत उत्सवाचे नियोजन, संभाव्य अडचणी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी आनंदात, पण शिस्तीत जयंती साजरी करावी, यावर पोलीस प्रशासनाने विशेष भर दिला.
बैठकीदरम्यान विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या. मिरवणुकीचे मार्ग, वाहतूक व्यवस्थापन, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, तसेच सुरक्षेसंबंधी काही मुद्दे पोलीस प्रशासनासमोर मांडण्यात आले. यावर पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या समजून घेतल्या आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.
“महामानवाची जयंती शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.
या बैठकीला नगरसेवक दीपक जाधव, समाजसेवक अमोल केंद्रे, दिनेश पाटील, सोपान जाधव, सुवर्णा कांबळे, उद्योजक बालाजी कदम यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच दिवा शहरातील अनेक जयंती मंडळांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
बैठकीच्या शेवटी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यंदाची आंबेडकर जयंती दिवा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण, पण शिस्तबद्ध आणि शांततेत साजरी करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
