मशीन सुरू, पण लाईट बंद — मोबाईल टॉर्चच्या उजेडात व्यवहार; बँकेने तातडीने उपाययोजना करावी, नागरिकांची मागणी
📍जळगांव (नशिराबाद) : येथील भारतीय स्टेट बँक एसबीआय च्या एटीएम केंद्रात गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळे ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एटीएम मशीन कार्यरत असले तरी रूममधील लाईट बंद असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी व्यवहार करताना नागरिकांना अक्षरशः अंधारातच पैसे काढावे लागत आहेत.
नशिराबाद हे सुमारे ३० हजार लोकसंख्येचे मोठे गाव असताना, मुख्य बँकेच्या एटीएममध्ये साधी प्रकाशयोजना नसणे हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पिन नंबर टाकताना तसेच पैसे मोजताना मोबाईलचा टॉर्च वापरण्याची वेळ ग्राहकांवर येत असून, त्यामुळे सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
एटीएममध्ये कधी रोख रक्कम नसणे, तर आता सलग तीन दिवसांपासून अंधार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधित बँक प्रशासनाने या किरकोळ वाटणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन लाईटची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
