भुसावळ तहसील कार्यालयाचा ‘AC’ कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारातून गंभीर प्रश्न
AC बसविण्याच्या खर्चासह नियमांचे पालन झाले का? अपूर्ण माहिती मिळाल्याने अर्जदाराचा प्रथम अपिलाचा मार्ग
भुसावळ | प्रतिनिधी :
भुसावळ तहसील कार्यालयातील वातानुकूलित (AC) यंत्रणेच्या खर्चावरून आणि ती बसविताना प्रशासकीय नियमांचे पालन झाले आहे का, यावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहितीच्या अधिकारातून (RTI) मागविण्यात आलेल्या माहितीत अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट झाले नसल्याचा आरोप अर्जदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केले आहे.
कोणत्या मुद्द्यांवर मागविली माहिती?
प्रमोद पाटील यांनी तहसील कार्यालयातील AC यंत्रणेबाबत विविध बाबींची माहिती मागविली होती. त्यामध्ये कोणत्या दालनांमध्ये AC बसविण्यात आले आहेत, संबंधित अधिकाऱ्यांचा Pay Matrix Level काय आहे, AC बसविण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आवश्यक पात्रता पूर्ण होते का, तसेच AC खरेदीसाठी कोणत्या बजेट हेडमधून निधी खर्च करण्यात आला, यासारख्या बाबींचा समावेश आहे.
याशिवाय AC यंत्रणेमुळे मागील दोन वर्षांत वीज वापर व वीज बिलात झालेली वाढ, तसेच AC बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) तांत्रिक मंजुरी घेण्यात आली होती का, याचीही माहिती मागविण्यात आली होती.
मिळालेली माहिती अपूर्ण असल्याचा आरोप
तहसील कार्यालयाकडून काही माहिती उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी मागविलेल्या सर्व मुद्द्यांची समाधानकारक व स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. त्यामुळे AC यंत्रणा बसविताना शासनाच्या नियमांचे पालन झाले आहे का आणि त्यासाठी करण्यात आलेला खर्च नियमानुसार आहे का, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत या प्रकरणातील कागदपत्रे उपलब्ध असल्याचेही अर्जदाराने नमूद केले आहे.
प्रथम अपिलातून संपूर्ण माहितीची मागणी
जन माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अपूर्ण माहितीनंतर प्रमोद पाटील यांनी आता प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. प्रथम अपिलात मागविलेली संपूर्ण माहिती स्पष्ट स्वरूपात आणि नियमानुसार विनाशुल्क उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविताना लागू असलेल्या नियमांचे पालन झाले आहे का, निधीचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे का आणि तांत्रिक मंजुरी घेण्यात आली होती का, या प्रश्नांची उत्तरे प्रथम अपिलाच्या निर्णयातून समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुसावळ तहसील कार्यालयाकडून या प्रकरणी काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
