कविसंमेलन, भीमगीत प्रकाशन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध “दिनकर सन्मान” पुरस्कारांनी गौरव करणारा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कविसंमेलन, अभिवाचन, भीमगीत प्रकाशन आणि पुरस्कार वितरण अशा विविध उपक्रमांनी सजलेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे आयोजक तथा “मराठी साहित्य व कला सेवा” संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या दशकभराच्या साहित्य-सांस्कृतिक प्रवासाचा आढावा घेत मराठी भाषा, साहित्य आणि कलेच्या जतनासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सोहळ्यास लोकसंगीत गायक नंदेश विठ्ठल उमप, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, शिवसाहित्याचे अभ्यासक डॉ. हेमंतराजे गायकवाड तसेच दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नंदेश उमप म्हणाले, “लोककला आणि साहित्य यांचा वारसा जपणाऱ्या संस्था समाजाला सांस्कृतिक दिशा देतात.” तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी “नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही मोठी सांस्कृतिक सेवा आहे,” असे सांगितले. डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. प्रकाश सावंत यांनी पत्रकारिता, साहित्य आणि समाजकार्य यांचा संगम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या भीमगीत प्रकाशन सोहळ्यात संस्थेचे सदस्य विलास सूर्यवंशी लिखित भीमगीताचे प्रकाशन करण्यात आले. गीताच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
या वेळी पत्रकारिता, साहित्य, समाजसेवा, शिक्षण, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना विविध “दिनकर सन्मान” पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चेसबॉक्सिंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्नेहा वायकर यांना “दिनकर खेलरत्न सन्मान” प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात आयोजित कविसंमेलन आणि अभिवाचनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्योती राखुंडे, विवेक वसंत जोशी, सीमा खान शेख, रूपाली जाधव, डॉ. मानसी पाटील, कृपा म्हात्रे आदी कवी-कवयित्रींनी आपल्या रचनांमधून साहित्यिक रंगत निर्माण केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित साहित्यिक, कलाकार, संस्था आणि रसिकांचे आयोजकांनी आभार मानले.
