जळगावमध्ये उद्या ऐतिहासिक ‘शहीद स्मारक’चे भूमिपूजन; वीर जवानांच्या शौर्याला मिळणार उजाळा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन; रक्षा खडसे, गिरीश महाजन, संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव | प्रतिनिधी :
देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी जळगावमध्ये ‘शहीद स्मारक’ उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आणि जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित हा सोहळा देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. जिल्ह्यातील वीर जवानांच्या शौर्याचा आणि त्यागाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या स्मारकाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
शहीद स्मारकाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या सोहळ्यास जळगावच्या महापौर दीपमाला काळे, खासदार उज्ज्वल निकम, लोकसभा सदस्य स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील विविध आमदार व विधानपरिषद सदस्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
देशसेवेची प्रेरणा देणारे स्मारक
शहीद स्मारकाच्या आराखड्याची संकल्पना शंभू पाटील यांनी मांडली असून, आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी त्याचे डिझाइन तयार केले आहे. जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक मेजर (डॉ.) निलेश पाटील (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव आहेत.
जळगावच्या भूमीत उभारले जाणारे हे शहीद स्मारक देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्याबरोबरच देशसेवा, शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा पुढील पिढ्यांना देणारे केंद्र ठरणार आहे.
या महत्त्वपूर्ण भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
